Durva Ayurveda

आजवर अनेक विषाणू आले परंतु संपूर्ण विश्वात ज्याने कहर केला तो म्हणजे कोरोना विषाणू. या विषाणू चा प्रसार वेगाने होत असल्याने रुग्णांची संख्या देखील गुणाकार स्वरूपात वाढू लागली आहे. या विषाणू ची लक्षणे सुरुवातीच्या काळात तीव्र ज्वर, सुखा खोकला आणि दम लागणे अशी असली तरी नवीन लक्षणामध्ये खूप भर पडत चालली आहे. कोरोना बरा झाल्यानंतर सगळी लक्षणे कमी होतात पण एक लक्षण बऱ्याच जणांमध्ये कोरोना असताना आणि बरा झाल्यानंतर देखील आढळून येते ते म्हणजे थकवा!!!

       हा विषाणू शरीरात गेल्या नंतर शरीरात रोग प्रतिकार शक्ती सक्रिय होते. आणि या विषाणू विरोधी अँटीबॉडीज तयार होत असतात. या अँटीबॉडीज तयार करण्यासाठी शरीरातील प्रथिने आणि ऊर्जा खर्ची पडत असते. विषाणू चा प्रादुर्भाव असल्याने संपूर्ण शरीराला मरगळ असते, सर्व सांध्या मध्ये वेदना असतात, जिभेला चव समजत नसते, गंध शक्ती कमी झालेली असते. परिणाम स्वरूप अन्न पदार्थ वरची इच्छा कमी होते आणि थकवा हे लक्षण निर्माण होते.

      कोरोना बरा झाल्यानंतर देखील शरीरातील ही जीवनसत्त्वाची पोकळी लवकर भरून येत नाही. त्यामुळे हा थकवा संपूर्णतः शारीरिक असतो. काही रुग्णांमध्ये २० दिवस तर काही मध्ये अगदी ४५ दिवसापर्यंत हा थकवा राहतो. परंतु जो रुग्ण आराम न करता पुन्हा शरीराला थकवा येणारी क्रिया केली तर हा थकवा पुन्हा आजारात रूपांतरित होवू शकतो. आजार बरा झाल्यानंतर प्रत्येक रुग्णाला किमान १५ दिवस आराम करणे आवश्यक आहे.

थकवा दूर करण्यासाठी चे उपाय:

  • शरीर आणि मन यांना ताण येईल अशा सर्व प्रकारच्या क्रिया करणे टाळावे.
  • आजार असताना आणि बरा झाल्यानंतर संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे. आहारात पुरेशा प्रमाणत प्रथिने आणि सर्व जीवनसत्वे असतील याची काळजी घेतली पाहिजे. हिरव्या पालेभाज्या आणि ऋतूनुसार मिळणारी ताजी फळे मुख्यतः मोसंबी, संत्री, आवळा, पेरू आणि सफरचंद खावीत.
  • शरीर थकव्यातून लवकर बाहेर पाण्यासाठी किमान ७ ते ८ तासांची गाढ झोप घेणे आवश्यक आहे.
  • या काळात शरीर विषाणू चा प्रसार करू शकते म्हणून शरीर संबंध देखील करणे टाळावे.
  • मनाचा थकवा दूर करण्यासाठी नियमितपणे ४५ मिनिटे योगाभ्यास करावा.
  • या विषाणूला फुफुसाबद्दल विशेष आसक्ती असते, त्यामुळे पल्मोनारी फायब्रोसिस झालेला असू शकतो. आणि त्यामुळे थोड्या परिश्रमाने दम लागत असतो. यासाठी फुफुसांवर विशेष प्रभाव असणारी आयुर्वेदिक औषधे जसे सितोपलादी चूर्ण, तालिषादी चूर्ण, अभ्रक भस्म, लक्ष्मीविलास रस, गोडांती भस्म, अगस्त्य हरीतकी अवलेह आणि च्यवनप्राश वैद्यकीय सल्ल्यानुसार घ्यावी.
  • अनुलोम – विलोम आणि भ्रामरी प्राणायाम दिवसातून दोन वेळा ३० मिनिटे करावा.
  • दिवसभरात केवळ कोमट पाणी प्यावे त्यामुळे घशाची सूज कमी होते आणि पचनशक्ती देखील सुधारण्यास मदत होते.
  • इलेक्ट्रोलाट्स पावडर जसे ORS, Health Ok, Neurokind Gold sachet १ ग्लास साध्या पाण्यात मिश्रण करून पील्याने शरीरातील पाण्याची आणि Mineral ची मात्रा योग्य प्रमाणात राखली जाते.
  • कोमट पाण्याने चेहऱ्याला वाफ तसेच गुळण्या आवर्जून कराव्यात.
  • सैंधव युक्त तीळ तेलाने छातीला वाफ द्यावी.

     कोविड १९ हा पूर्णतः नवीन आजार आहे आणि फारसे संशोधन अजून झालेले नाही. या आजाराने केवळ शरीर नाही तर मनावर देखील विपरीत परिणाम होतो. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या हा आजार रुग्णाला त्रास देत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे हेच हिताचे आहे.

डॉ रुपेश आमले (एम.डी) आयुर्वेद

दुर्वा आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक

शॉप नो. १०, लक्ष्मीनारायण कॉम्प्लेक्स,

सेक्टर १२ अ, कोपर खैरने,

नवी मुंबई ४००७०९

मो. ९७७३७५५५७२